तीन महिन्यांपासून जलसंपदा खाते पूर्णवेळ प्रधान सचिवाविना पोरकेच! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री असूनही पाणी का आडले? मंत्रालयात चर्चा!


मुंबई : महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली त्यावेळी अजित पवार या सरकारमध्येअसतील का आणि त्यांना वादग्रस्त जलसंपदा खाते मिळणार का ? या प्रश्नाचे उत्तर यथावकाश मिळाले तरी या विभागातून प्रधान सचिव इकबाल सिंग चहल यांची नगर विकास विभागात बदली झाल्यानंतर जलसंपदा खात्याला गेल्या तीन महिन्यात वाली कोण या प्रश्नाचे उत्तर काही सापडत नाही.  कोरोनाच्या संकट काळात भाजप सरकारचे ब्लू आईड बॉय समजले जाणारे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे जलसंपदाचा कार्यभार  देण्यात आला होता तो पण अतिरिक्त. या तीन महिन्याच्या काळात प्रवीण परदेशी यांचे मात्र महाराष्ट्रात मन लागत नव्हते. त्याची कारणे काहीही असतील. सत्ताबदल झाला आणि सारी पाटातील गोट्याची पांगापांग झाली.

सध्या जलसंपदा सारखे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे असलेले अत्यंत महत्त्वाचे खाते पण बीना प्रधान सचिवाचे राहिले आहे. ज्या खात्यातील पाण्यावर शेतकऱ्यांचे, गांवक-याचे,  शहरवासीयांचे कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे अशा या महत्त्वपूर्ण खात्याकडे कुणाचेही लक्ष नाही, की राज्यकर्त्यांना मनासारखा पूर्णवेळ काम करणारा अधिकारी सापडत नाही.  काही असो पण जलसंपदाला प्रधान सचिव मिळेनासा झाला. प्रवीण परदेशी जलसंपदात आले हा सुखावह क्षण होता. त्यांचा दर्जा हा अतिरिक्त मुख्य सचिव या पदाचा असल्याने व त्यांनी मागील भाजपाच्या कार्यकाळात केलेले काम, त्यामुळे निर्माण झालेला त्यांचा दबदबा, जलसंपदाच्या कामी येईल आणि जलसंपदाचे कार्य राफेल पेक्षा वेगाने पुढे जाईल असे वाटले होते,  पण हे स्वप्नच राहिले. हे या विभागाचे दुर्दैवच. चहल साहेब असतांना जलसंपदा विभाग शांतपणे चालत होता. ती चाल शांत असली तरी ती निरंतर होती. कारण त्यांचा स्वभाव मन मोकळा होता. त्यांना आपल्या मर्यादा माहित होत्या. ते कधी बदल्यांच्या, रेती सारख्या निविदाच्या भानगडीत पडले नाहीत म्हणूनच माजी मंत्री महाजन सारखे मुरब्बी लोकही त्यांचे चाहते होते. महाजनाची कार्यप्रणाली त्यांनी समजावून घेतली होती. नियामक मंडळात आलेल्या अनियमित प्रकरणात ते खूप गुंतवून घेत नव्हते.

जिथे कुठे मंत्र्यांचा खास कटाक्ष असायचा त्या त्या ठिकाणी ते पहल करत नसे किंवा दोन पावले मागे जात असत. नवीन माणूस आल्यावर त्याला अशाप्रकारे ऍडजेस्ट व्हायला वेळ लागणारच. जुन्याना जे जमले ते येणाऱ्या प्रत्येकालाच जमेल असे नाही. त्यातल्या त्यात प्रवीण परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय सांभाळले होते. सत्तेची किल्ली त्यांचेकडे होती.  पण त्यांना तेथे न बसविता नगर विकास व जलसंपदात बसविले. आज संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनियुक्तीवर प्रवीण परदेशी जात आहे. अनेक ठिकाणी अनेक चांगली कामे त्यांनी केलेली आहे. अगोदर सुद्धा संयुक्त राष्ट्रात नैसर्गिक आपत्ती नंतरचे पुनर्वसन या महत्त्वाच्या क्षेत्रात सात वर्ष त्यांनी काम केलेले आहे. त्यांना मनासारखे काम मिळाल्याने ते त्वरीत कार्यमुक्त झाले. त्यांचे जागी भूषण गगराणी यांची नगर विकास विभागाचे सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. जलसंपदा चा अतिरिक्त कारभार भूषण गगराणी यांच्याकडे जाईल असे वाटते. शेवटी परत जलसंपदाला पूर्ण वेळेचा प्रधान सचिव मिळेनासा झाला आहे. 

Social Media