मुंबई सह कोकणात आधी कोरोना आता पावसाने उडवली दैना!गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न!


मुंबई : हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरवत मुंबईसह, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दक्षिण मुंबईत जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. हवामान खात्याने आणखी २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घटल्या आहेत. सीएसएमटी स्टेशनच्या मागे, मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरही झाडे कोसळली आहेत. मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोरही झाडे कोसळली आहेत. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याने, ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. गिरगाव चौपाटीजवळचा रस्ता जलमय झाला आहे. तसंच जेजे हॉस्पिटलबाहेरही पाणी साचले आहे. भायखळ्यात अनेक परिसरात रस्ते जलमय झाले आहेत. 

मुंबईतील तुफान पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ट्रेन सुरु आहेत. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा लोकल वाहतूक बंद आहे. सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे.  हार्बर मार्गावरील सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तसंच मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूकही बंद आहे. हवामान खात्याकडून पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणातही पावासाचा जोर कायम आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न आले आहे. रायगड जिल्‍हयातही वाऱ्यासह तुफान पाऊस आहे. महाडसह पोलादपूर , माणगाव , म्हसळा , अलिबाग , रोहा , पाली तळा या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.  सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.  तर कुंडलिका आणि अंबा नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे. महाड बाजारपेठेत कालपासून आलेले पुराचे पाणी कमी झाले नाही. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई – गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. माणगाव जवळ घोडनदीला पूर आल्याने वाहतूक भिरा निजामपूर मार्गे वळवली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने हा पूल धोकादायक झाला आहे. 

Social Media