आषाढी एकादशी

नारदमुनींच्या सांगण्या वरुन त्या रात्रीच श्रीकृष्ण (Sri Krishna)रुक्मिणींनी(Rukmini) पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी, श्रीकृष्ण पप्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले. परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतस्ततः चिखल पसरली असल्याने त्यांनी अंगणातुनच पुंडलिकास हाक दिली.

साक्षात “विष्णुदेव” आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला. आणि आदरभावे म्हणाला, ” पांडुरंगा माझ्या आईवडिलांची मी प्रातर्विधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळेत बाहेर येईन “.

श्रीविष्णुंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळच असलेली एक विट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली. आणि पांडुरंगास विनंती केली की “मी बाहेर येईस्तोवर कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे रहा.”

श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटिवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहु लागले . पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्रीविष्णुंचे दुरुनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले.

श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले. आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायच होते हे खुद्द “श्रीकृष्णास” सुध्दा कळले नाही.

एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये, त्याच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघुन शंकेची चर्चा सुरू झाली . थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला. तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला “रखुमाई” देखील तिथे आली.

पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सदगृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघतात तर काय, पुंडलिकाचे आईवडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होवून त्याने देखील स्वतःचे प्राण त्यागले आहे.

पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तत्काळ आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थित जनसमुदाय समोरच त्यांनी त्याच्या आत्म्यास पाचारण केले. आणि म्हणाले,

” पुंडलिका मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे. ह्या कलीयुगात मात्र कृतयुगातल्या भक्त प्रल्हाद पेक्षाही तुझी माझ्या प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल. त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पुजेत पप्रथम तुझेच नांव आवर्जुन घेतले जाईल पुंडलिका.

तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो असुन आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाणरुपात ह्याच पंढरीत पुढली २८युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन.

भले ते गोरगरीब, मध्यम, श्रीमंत कुणीही तसेच कोणत्याही जातीचे, पंथाचे, धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्या प्रती आस्था ठेवून स्वतःचे मातापिता, कुटुंब, गुरू, व्यवसाय, समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. येणाऱ्या सर्व संकटांपासुन त्यांचे संरक्षण करीन. हेच वरदान दिले आज तुला.” असे म्हणुन आहे त्याच ठिकाणी पाषाणमुर्तीत रुपांतर होवून “पांडुरंग” अंतर्धान पावले.

ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या “रखुमाई” देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमुर्तीत रुपांतर होवून त्याही अंतर्धान पावल्या.

“हेची देही हेची डोळा” ह्या उक्ती नुसार तेथील उपस्थित जनसमुदाय, हा दैवी चमत्कार पाहुन थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले,
“बोला पुंडलिका, वर दे हारी विठ्ठल !
रखुमाई पांडुरंगा, वर दे हारी विठ्ठल !!

आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने “विठ्ठल आणि रखुमाई” च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशिर्वाद घेण्यासाठीची जी रिघ लागली ती अद्यापही अखंडित व अविरत चालू आहे हे विशेष.

अशा तर्‍हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णू*नी, द्वारकानिवासी *”श्रीकृष्ण रुक्मिणी” च्या रुपात आजही पृथ्वीतलावरच्या ह्या पुण्यनगरीत “पंढरपूर ” इथे पाषाण स्वरुपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजेच ही “आषाढी एकादशी “.

आणि म्हणूनच खास ह्या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णवभक्त पंढरपूरला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशिर्वाद घेण्यात धन्यता मानतात. आणि नक्कीच ह्या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काही तरी दान व समाधान त्यांना मिळत असणार.

अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी काही दीडशेच्या संख्येने सुरू केलेल्या “वारी” ह्या प्रथेला आज कैक लाख भाविकांची वर्णी लागली नसती हे आपल्याला आज मान्यच करावे लागेल. म्हणून बोला,

!! जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल !!
!! जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल !!

Social Media