टाळेबंदी हटवा अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवून आंदोलन : वंचित बहुजन आघाडीचा इशारा!


मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. मात्र, राज्य सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षा पेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे टाळेबंदी हटावावी आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा. अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवून आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

“दुकानांची सम-विषम ही पद्धत कधी संपवणार आहात? छोटे दुकानदार, टपरिवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ संकटात आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही. एसटी रस्तावर कधी धावेल त्याची तारीख सांगा. सरकार हे सांगणार नसेल तर 10 ऑगस्टनंतर कधीही आम्ही रस्त्यावर उतरु”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. “लोकांचे हाल होत आहेत. या महिन्यात पाऊस 15 दिवस पडणार असल्याचा अंदाज आहे. कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील धरणं 40 ते 70 टक्के भरले आहेत. पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोना-कोराना करण्याऐवजी पुराचे नियोजन सांगा. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. तरीही सरकार गंभीर नाही”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. “सरकारने फिक्स टाईमटेबल सांगावे. कधी काय सुरु करणार ते सांगावे. सध्या सर्व राम भरोसे सुरु आहे. सध्या सरकारी पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत. जिल्हाधिकारी निर्णय घेतात, हे चुकीचे आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालढकल करत आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Social Media