पोहरादेवीचे महत्व नष्ट करण्याच्या प्रयत्नाविरुध्द संतापाची लाट.

यवतमाळ : भाजप व संघाकडून बंजारा(banjara) समाजाची पर्यायी काशी निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले आहेत. भाजपाने जळगाव जिल्हयातील गोद्री येथे बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. या षडयंत्राविरुध्द बंजारा समाज बांधवांनी एकत्रित होऊन भाजपाचा कपटी डाव हाणून पाडावा यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पोहरादेवी येथे आयोजित या सभेला बंजारा बांधवांनी उपस्थित रहावे आणि आपले स्पष्ट मत व्यक्त करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार(Devanand Pawar) यांनी केले आहे.

भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची हिंदु सनातन गोर बंजारा अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरोगामी विचाराच्या बंजारा समाजाची सनातनी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न मान्य नसल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे. राजकीय स्वार्थासाठी पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचे पाप भाजपाने करु नये असे स्पष्ट केले असतांनाही भाजपा आपल्या निर्णयापासून मागे हटायला तयार नाही. त्यामुळे बंजारा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर विषयावर समाजातील नागरीकांना माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्याही भावना समजून घेण्यासाठी रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता पोहरादेवी येथील भक्तीधाम येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा संत श्री. सेवालाल महाराज सेवा समिती, महाराष्ट्रने आयोजित केली आहे. या सभेत पोहरादेवीचे महंत, समाजाचे प्रमुख नेते व प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सभेत राज्यातील बंजारा समाजाच्या विविध सामाजिक संघटना, अधिकारी-कर्मचारी संघटना तसेच समाज बांधवांनी उपस्थित राहून आपले मत व्यक्त करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी केले आहे.

भाजपाचे षडयंत्र हाणून पाडणार..

पुरोगामी बंजारा समाजाला सनातनी बनविण्याचे भाजपाचे षडयंत्र आम्ही पुर्ण होऊ देणार नाही. मागासलेला असला तरी बंजारा समाज सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सतत अग्रेसर राहीला आहे. भाजपाची निती समाजात तेढ निर्माण करणारी आहे. आम्ही त्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही. त्यामुळेच समाजात जागृकता निर्माण करण्याचे आम्ही प्रयत्न सुरु केले असल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे.

Social Media