पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळाची स्थापना करा ; ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांची मागणी 

मुंबई  (प्रतिनिधी) : न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी  आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक मानसिक सुरक्षा व हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर(Acharya Balshastri Jambhekar) यांच्या नावाने महामंडळ किंवा आयोग तातडीने महाराष्ट्रात तयार होण्याची गरज आहे. मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाची ही मागणी रास्त आहे‌. निवेदने देऊनही सरकार ऐकत नसेल तर इतर सनदशीर मार्ग आहेतच. आजच्या घडीला देश व राज्यासाठी माध्यमे व न्याय हे दोन स्तंभच मोठे योगदान देऊ शकतात अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी मांडली.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)च्या वतीने चौथ्या स्तंभाच्या हक्क व सन्मानासाठी नुकताच एक मुक्त संवाद नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या  ऋणानुबंध सभागृहात आयोजित करण्यात आला होता .  ‘पत्रकार..माध्यमे आणि वर्तमान आव्हाने’ या मुक्त संवादात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, किशोर आपटे, चेतन काशीकर  आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड्. नितीन सातपुते यांनी  आपल्या भूमिका मांडून बदलती पत्रकारिता आणि पत्रकारांच्या समस्या यावर मोकळ्या पणाने आपले विचार मांडले.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) च्या पुढाकाराने पहिल्या देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन  नुकतेच करण्यात आले होते.
 जेष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी म्हणाले की, प्रसार माध्यमांना  स्वातंत्र्य द्या, प्रत्येकाला कर्तव्याची व जबाबदारीची  जाणीव आहे. त्याच्यावर सरकारने विश्वास ठेवावा. महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक पत्रकाराला  अधिस्विकृती पत्रिका देण्यात यावी, तसेच पत्रकारांना पेन्शन नाही पण पेन्शन ऐवजी देण्यात येणारी सन्मान योजना सन्मानाने द्यावी, असे स्पष्ट करतांना आजवर पत्रकार हितासाठी होणाऱ्या सरकारी अक्षम्य दिरंगाईबद्दल ताशेरे ओढले. तसेच माईने केलेली पत्रकार महामंडळाची मागणी रास्त आहे, ज्या सरकारपुढे लोटांगण घालणाऱ्या संघटना वगळून इतर संघटनांना सोबत घेऊन यासाठी काम करावे.
 किशोर आपटे यांनी सांगितले की,  मंत्रालय आणि विधिमंडळ कव्हरेज करतांना  २०१४ नंतर जे बदल होत गेले ते पत्रकारितेसाठी योग्य नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)म्हणायचे ‘गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या तशीच परिस्थिती झाली आहे. पत्रकार कोणाला  म्हणायचे ? याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडे ठोस असे काहीही नाही, सलग 30 वर्षे पत्रकारिता  केलेल्या पत्रकाराला पेन्शन लागू मात्र, त्यात जाचक अटी असल्याने पेन्शन लागू होत नाही, पत्रकारांसाठीची योजना म्हणजे गाजर आहे.
चेतन काशीकर यांनी ‘ज्येष्ठ  पत्रकारांना होणारा त्रास तसेच नवीन पत्रकारांना तुटपुंज्या मानधनात करावी लागणारी पत्रकारिता, किमान वेतन न देता जाहिराती आणा, या साठी व्यवस्थापनाने लावलेला तगादा मोकळेपणाने मांडला. बदलत्या काळाप्रमाणे  बदलत्या माध्यमांना तंत्रविज्ञानाने एक वेगळे वळण देण्यात येत आहे . आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( A I) इतका धोकादायक आहे की कोणाचाही क्लोन बनवून कुठचाही माणूस उभा करू शकतो आणि त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या काही पत्रकारांवर होण्याची दाट शक्यता आहे त्यात मुख्य म्हणजे येणारा नवीन कायदा हा त्यांना अतिशय वेगळ्या वळणावरती येऊन ठेवेल याकरिता सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन ठोस पावलं उचलली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
माई च्या संस्थापक  अध्यक्षा शीतल करदेकर यांनी  सांगितले की, ‘पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत, यासाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया सर्वोतोपरी काम करणार, माध्यम कर्मचाऱ्यांसाठी  सरकारने महामंडळ वा आयोग गठीत केल्यास त्या माध्यमातून पत्रकार व सर्व माध्यम कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन, मेडिकल सुविधा मिळाव्यात तसेच नवीन पत्रकारांना  किमान वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी खंबीरपणे कार्य करणार आहोत. मीडियाचे धोरण असायलाच हवे ! मराठी वर्तमानपत्राच्या जाहिराती कमी इंग्रजीला जास्त. दोघांच्या दरात मोठा फरक आहे तरीही मराठीला कमीपणा का? हे कोण व का करते आहे ?अंत्योदय हितासाठी छोट्या व मध्यम नियतकालिकांना ताकद देणे अत्यावश्यक आहे. जे फक्त पत्रकारितेवर आपलं पोट भरतात अशांना पत्रकार म्हणून ओळख देणं ही सरकारची जबाबदारी आहे‌.

माध्यमांच्या मालकांच्या एकूण कमाईवर माध्यमात काम करणाऱ्यांचे वेतन वाढायला हवे!

 

१जुलैपासून अंमलबजावणी होणाऱ्या सोशल मीडिया साठीच्या कायद्याचा धोका माध्यमकर्मीना होऊ शकतो त्याठी आम्ही पत्रकार  व कायदेतज्ञ  मिळून काम करणार आहोत. महाराष्ट्र सरकारने यासाठी इच्छाशक्ति तयार करायला हवी.
कार्यक्रमाचे आयोजन  माई(Mai) चे मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांनी केले तर सह संघटक सचिव अनिल चासकर तसेच सांगलीचे संघटन सचिव लक्ष्मण खटके यांनी प्रमुख वक्ते व मान्यवरांचा शाल श्रीफळ  व एका मोठ्या पुष्पहाराने स्वागत केले. संभाजीनगरचे संस्थापक, संघटक डाॅ अब्दुल कादिर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सरचिटणीस  हेमंत टकले व व्यवस्थापकीय  पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच छत्रपती फौंडेशनचे भारत शिंदे यांचे आणि सर्व  वक्ते उपस्थित माध्यम कर्मींचे माई चे संस्थापक सरचिटणीस  कोल्हापूर चे डाॅ सुभाष सामंत यांनी आभार मानले
कार्यक्रमास माई चे शेखर धोंगडे,  सुनिल कटेकर, प्रविण वाघमारे,अविनाश धुमाळ, आदी पदाधिकारी, सुरज खरटमल, गणेश तळेकर,  गणेश गारगोटे, राम कोंडिलकर, मंदार जोशी, वैभव बागकर, विनीत मासावकर आदी माध्यमकर्मी उपस्थित होते
Social Media