सहकारी बँका खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीती ; शरद पवारांची पंतप्रधानाच्या पत्रातून चिंता व्यक्त!

मुंबई  : ‘सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलल्याने समस्या सुटणार नाही. सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटले जाते, मात्र सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीती असल्याचा गंभीर इशारा देत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानाना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षांत सहकारी क्षेत्रांत गैरव्यवहार कमी झाले आहेत. शरद पवारांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी देत या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

शरद पवार यांनी सहकार बँका वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘सहकारी बँकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. मात्र सहकारी बँकांचे सहकारपण कायम ठेवले पाहिजे. असे झाले तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसेच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील.’त्यांनी म्हटले आहे की, सहकारी बँकांनी देशात बँकिंग साक्षरता वाढविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पंतप्रधानांना पवारांनी अलिकडच्या काळात लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, याच्याशी पंतप्रधानही सहमत असतील, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

शरद पवार पत्रात म्हणाले की, ‘स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला. मध्यमवर्गीयांच्या हितासाठी केंद्र सरकारने सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे तुम्ही सांगितले. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो.’ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सहकारी बँकांची परंपरा शंभर वर्षांची आहे. सहकारी बँका सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून पहिल्यांदा पाहिल्यावर रिझर्व्ह बँकेचे आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून आखलेले सहकारी बँकांबाबतचे धोरण अस्पृश्यतेचे राहिले आहे.’

Social Media