पूर स्थिती .! स्थलांतरित व्हा,अन्यथा घरे सील करु,पालिकेचा पूर पट्ट्यातील नागरिकांना इशारा

सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातल्या पुर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर होण्याचे आदेश जारी केले आहेत,तसेच जे लोक स्थलांतरित होणार नाहीत,त्यांची घरे सील करण्याचा इशारा पालिका आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिला आहे.त्याच बरोबर पालिका प्रशासनाच्या वतीने कोणत्या भागात किती फुटांवर पाणी येऊ शकते आणि नागरिकांना कुठे स्थलांतर व्हायचं ? याबाबतचे पत्रकही काढण्यात आले आहे.

कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्याचबरोबर कोयना धरणातून ही कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये सांगलीत झपाट्याने वाढ होत आहे.एका दिवसात जवळपास दहा फुटाहुन अधिक पाण्याची पातळी वाढली आहे. सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी 35 फूट पर्यंत जाईल, अशा सूचनाही पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.त्यामुळे खबरदारी म्हणुन पाणी पातळी वाढण्याची वाट न बघता पालिका प्रशासनाने पुर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याबाबतचे आदेश जारी केले आहे.

तसेच जे लोक स्थलांतर करणार नाहीत, त्यांची घरे सील करण्यात येतील,असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. त्याच बरोबर पालिका प्रशासनाने 3 हजार नागरिकांची निवाऱ्याची सोय केली आहे.तसेच पाण्याची पातळी किती फूट झाल्यास कोणत्या भागात पाणी येऊ शकतं,आणि तेथील नागरिकांनी कुठे स्थलांतर करायचे आहे,याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.त्याचबरोबर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्यावतीने दत्तनगर, काका नगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमछ कॉलनी या ठिकाणी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वजा इशारा देण्यात येत आहे.

Social Media