पूरग्रस्तांचा इस्लामपुरात मोर्चा

सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी इस्लामपूर येथे प्रांत कार्यालयासमोर करण्यात आली. तहसील कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. मदत वितरणास विलंब होत असल्याने मोर्चातील लोकांनी संताप व्यक्त केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील या मोर्चाच्या अग्रभागी होते.

सांगली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुरात नदीकाठच्या 4 तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले. वाळवा आणि शिराळा तालुक्यात अद्यापही पंचनामे सुरू आहेत. ऊस, सोयाबीन, मका, भाजीपाला, हळद, केळी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण भरपाई वितरण अद्याप सुरू झालेले नाही. ते लवकर व्हावे अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.

मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली.इस्लामपूर शहरात ठिकाणी असलेल्या नागरिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

Social Media