पहिल्याच टप्यात पाचपैकी तीन मतदारसंघात युतीपेक्षा आघाडी चे पारडे जड? 

निवडणूक विश्लेषण

मुंबई : (किशोर  आपटे) लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला पूर्व विदर्भातील(Eastern Vidarbha) पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा जोर पहायला मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची रामटेकमध्ये सभा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही(Devendra Fadnavis) रोड शो होणार आहे. महाविकास आघाडी ने देखील पाचही जागा खिशात टाकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

१९ एप्रिल रोजी नागपूर(Nagpur), रामटेक(Ramtek), भंडारा(Bhandara ) गोंदिया(Gondia), गडचिरोली(Gadchiroli), चंद्रपूर(Chandrapur) मतदारसंघात राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार केला जात आहे. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्व विदर्भातील प्रचारतोफा थंडावणार आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघ(Nagpur Lok Sabha constituency)

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. या जागेवरुन महायुतीकडून भाजपचे नितीन गडकरी तर मविआतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात उतरले आहेत. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघत दक्षिण-पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर अशा विधानसभा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडे पाहिले तर सर्वच मतदारसंघात काँग्रेसला निम्मी मते मिळाली आहेत. दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये तर ही मते निम्म्याहून अधिक असल्याचे दिसून येत आहे. विकास ठाकरे यांच्यासाठी कॉँग्रेसच्या शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही जोर लावला जात आहे. तर भाजपमधील एक नाराज गटही ठाकरे यांना मदत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रामटेकमधून कॉँग्रेसचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव (P V Narasimha Rao)दोनवेळा लोकसभेत (In the Lok Sabha)निवडून गेले होते. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve)यांची या मतदारसंघातून घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर शेवटी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे मविआकडून रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे उमेदवार राजू पारवे(Raju Parve) महायुतीकडून लढणार आहे. रामटेकचा(Ramtek) गड आपल्याकडे यावा यासाठी भाजप नेते इच्छुक होते, मात्र शेवटपर्यंत शिंदेंनी आपला आग्रह सोडला नाही आणि शेवटी राजू पारवेंना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसाठी या ठिकाणची लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा(Bhandara-Gondiya Lok Sabha)

भंडारा-गोंदिया लोकसभा(Bhandara-Gondiya Lok Sabha) मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुनील मेंढे(Sunil Mendhe) महायुतीचे पुन्हा उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे(Dr.Prahant Padole) रिंगणात आहेत. भाजपचे संजय कुंभलकर (Sanjay Kumbhalkar)हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये (Sevak Waghaye)हे दोघे अपक्ष मैदानात उतरले. वंचितने संजय केवट नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. बंडखोर आणि वंचित कुणाची किती मते खेचणार तसेच इथले मतदान किती उत्साहाने होणार यावर येथील निकालाचे चित्र अवलंबून आहे.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात(Gadchiroli-Chimur constituency) एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होणार असेच चित्र आहे. भाजपचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र सत्ताविरोधी वातावरणाचा त्यांना फटका बसू शकतो. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे सरकारी अधिकारी होते. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. ते हलबी समजाचे प्रतिनिधित्व करतात. नेते यांची तिसरी टर्म असल्याने सत्ताविरोधी वातावरणाचा किरसान यांना लाभ मिळू शकतो.

चंद्रपूर(Chandrapur) लोकसभा मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)विरूद्ध प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) असा सामना रंगणार आहे. काँग्रेसने या जागेवरुन काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर(Balu Dhanokar) यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूती तसेच कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यात या जागेवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)रिंगणात असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी(OBC) मतांसाठी छगन भुजबळही(Chhagan Bhujbal) चंद्रपुरात प्रचारसभा घेत आहेत. कॉँग्रेसच्या विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनीही या जागेवर जोरदार ताकद लावली आहे. त्यामुळे या पाचपैकी तीन मतदारसंघात युतीपेक्षा आघाडी चे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

Social Media