अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ! : केतकीच्या पोस्टवर राज ठाकरेंकडून निषेध पत्रक जारी!

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळेच्या आक्षापार्ह पोस्टवर सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्रक जारी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राजकारणात आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. तिने किंवा त्या भावेने हे लिहिणे साफ गैर असल्याचे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखे लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिने किंवा त्या भावेने हे लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवले! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा! पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजले असेलच. हे सगळे महाराष्ट्रात वेळीच आवरणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारने ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

Social Media