अखेर आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले नामांतराचे निर्णय…

मुंबई : राज्यातील सत्तेचा डोलारा डामाडौल असताना शिवसेनेच्या बंडखोर गटाला खुश करणारे निर्णय आज आघाडी सरकारने घेत अनेक नामांतराच्या प्रस्तावांना आज मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद(Aurangabad) शहराच्या “संभाजीनगर”(Sambhajinagar) नामकरणाची अनेक वर्षांची मागणी असताना आणि ज्यांची मूळ मागणी असलेला पक्ष सत्तेत असतानाही गेली अडीच वर्षे रखडलेला प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणासही आज मान्यता देण्यात आली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असे करण्याचा सिडकोचा प्रस्ताव बदलून गेले अनेक दिवस आंदोलनाच्या माध्यमातून मागणी होत असलेले ‘ लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

याशिवाय मंत्रिमंडळाने घेतलेले आणखी निर्णय पुढीलप्रमाणे..

  • राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
  • कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार(विधि व न्याय विभाग)
  • अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार (परिवहन विभाग)
  • ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
  • विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. (नियोजन विभाग)
  • निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग)
  • शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.(महसूल विभाग)
Social Media