नागपूर जिल्हयात अवकाळी पावसाने साडेसात हजार हेक्टरमधील पिकाला नुकसान; सर्वाधिक तूरीला फटका

नागपूर : नागपूर जिल्ह्यात नुकताच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर आज राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील विविध गारपीटग्रस्त भागात जाऊन पाहणी दौरा केला.

नागपूर जिल्ह्यात जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले असून तब्बल ८ हजार ३३४ खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने लावला आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे. तर भाजीपाला पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सावनेर, कामठी, पारशिवनी, रामटेक, तालुक्यात रब्बी पिकाला बसला आहे. बोर व आवळ्याच्या आकाराची गारपीट काही भागात झाली आहे.

जवळपास एक तासभर मंगळवारी अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही गावांमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी आज नागपूर जिल्ह्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमती, लोणखेरी, खापा, सावनेर तालुक्यातील दहेगाव पारशिवनी तालुक्यातील इटगाव भागीमहारी रामटेक तालुक्यातील जमुनिया, टुपार, घोटी, फुलझरी आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आणि राज्य शासनातर्फे तात्काळ मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल असे सांगितले आहे .

Social Media