इंदू मिल येथील पायाभरणी समारंभाच्या निमंत्रणावरून वादंगामुळे कार्यक्रम स्थगित! कुणीही राजकारण करू नये : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :  इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले  आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु अनेक नेत्यांच्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. पण यावरुन राजकारण करु नये असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

या कार्यक्रमाला केवळ १६जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे.
आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम नियोजित होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांची नावे निमंत्रितांच्या यादीत होती. नंतर या यादीत आनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

आंबेडकर चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आले नाही, तसेच इतर मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने नाराजीचा सूर उमटल्याचे बोलले जाते. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. महाराष्ट्र सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही त्यावेळी उपस्थित होते.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आनंदराज आंबेडकर आक्रमक झाले आहेत. याआधी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू, असे मत व्यक्त केले होते.

दादरच्या इंदूमिल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अचानक ठरलेला पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला. मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशीपर्यंत आले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे पुन्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने वळवण्यात आला. वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप मिळाल्याने अजित पवार पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

Social Media