“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो,असा सरकारचा समज आहे का??” मनसेच्या संदीप देशपांडेचा सरकारला सवाल!

मुंबई : बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. लोकल सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. “बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

लोकल लवकर सुरु करा अशी मागणी विशेषतः उपनगरात राहून दररोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.

Social Media