रखडलेल्या महसूल सुधारणांच्या राजस्व अभियानाची एक ऑगस्ट पासून अंमलबजावणी?!


 
मुंबई, दि. 29 जुलै : महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रखडलेल्या महसूल सुधारणाचे राजस्व अभियान कोविड-१९च्या महामारीत काहीसे बाजुला पडले होते. आता मात्र एक ऑगस्ट पासून तुमच्या शेतीच्या नोंदी आणि सातबारा उताऱ्यात महत्वाचे बदल करण्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती महसूल प्रशासनातील उच्च पदस्थांनी दिली आहे.

या महत्वाच्या बदलांमध्ये तुमचा खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात नमूद केला जात होता पण आता मात्र तो खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे. त्यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे. मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई -कराराच्या नोंदी कंसात दर्शविल्या जात होत्या पण आत्ता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात येणार आहेत.

या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झालेल्या क्षेत्रासाठी गाव नमुना न. १२ ची आवश्यकता राहणार नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे. तर नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार. गावाचे नावासोबत एलजीडी कोड (लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे आणि लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे. भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.

नमुना ७वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकान्याच्या खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार असून – सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार आणि बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर १२ छापला जाणार नाही. तो फक्त नुमना ७ असणार आहे. असे यासूत्रांनी सांगितले. नव्या बदलानुसार आता गाव नमुना सातबारा व ८ (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचोन्ह व ई-महाभूमी प्रकल्पाच्या बोधचिन्हाचा वाटरमार्क दिसणार आहे.

Social Media