राज्यातील मुद्रीत माध्यमांना ठाकरे सरकारचा दिलासा

मुंबई  : गेल्या अनेक वर्षापासून मुद्रीत माध्यमे अडचणीत आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांची जाहिरात दरवाढ करावी, यासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या वतीने सातत्याने राज्य शासनस्तरावर प्रयत्न केला जात होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांना दरवाढ व श्रेणीवाढ दिली असल्याची माहिती असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, त्याचबरोबर माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, उपसंचालक, पुस्तके व प्रकाशने विभागाचे अधिकारी यांना आभाराचे पत्र देऊन राज्यातील लघु-मध्यम वृत्तपत्रांना दिलासा दिल्याबद्दल असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवरील ८३३ वृत्तपत्रांना जाहिरात दरवाढ व श्रेणीवाढ देऊन दिलासा दिला आहे. दरम्यान ४४ वृत्तपत्र शासनमान्य यादीवरून कमी करण्यात आली आहेत. कारण सदरची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत नसल्यामुळे, आणि अनियमित आहेत अशा वर्तमानपत्रांना शासनमान्य यादीतून वगळण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १३ ऑगस्ट रोजी शासन आदेश पारित करून ज्या वृत्तपत्रांना दरवाढ दिली आहे. आणि ज्या वृत्तपत्रांना श्रेणीवाढ दिली आहे. त्यांचा उल्लेखित सदर आदेशांमध्ये करण्यात आलेला आहे.

शासकीय संदेश प्रसार नियमावली २०१८ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नवीन नियमावलीनुसार जे वर्तमानपत्र पात्र आहेत. अशा महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांसह लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही दरवाढ, श्रेणीवाढ देण्यात आलेली आहे. ठाकरे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडियासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही संघटना सातत्याने वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याने अखेर या प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यामुळे अनेक संपादकांनी आनंद व्यक्त केला आहे. असे असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

Social Media