सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग!  

मुंबई :  सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. राज्य सरकारने आज जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र, ओबीसी समाजाचे असलेले विजय वडेट्टीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप करण्यात आला होता.

या आरोपांनी व्यथित झालेल्या मंत्री वडेट्टीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती. अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारितील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज यासंदर्भात शासन निर्णय जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारीही अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारने ‘सारथी’ संस्थेकडे दुर्लक्ष केले असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले होते. सारथी संस्थेबाबतचा पोरखेळ थांबवा, सरकारच्या आश्वासनांचे काय झालं? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक घेतली होती. संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजातील महत्वाच्या प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. त्याच बैठकीत सारथीला तत्काळ आठ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८अन्वये ना नफा सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.

Social Media